Sunday, October 4, 2015

ही माझी मुले आहेत....

ही माझी मुले आहेत....


       मुंबई सारख्या शहरात आई बाबांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो म्हणून मग ते मुलांसाठी गुंतविण्यासाठी विविध पर्याय शोधत असतात. मग मुले थोडी मोठी झाली कि मग ट्युशन क्लास, शाळा, अभ्यास यात ही मूले व्यस्त होतात. आई-बाबा स्वतः लक्ष देत नसले, तरी त्यांच्या मुलांकडून अपेक्षा मात्र खूप असतात. असेच एका रविवारी सायंकाळी रडण्या-ओरडण्याचा आवाज येत होता. असा आवाज आल्यावर साहजिकच मनात शंकांचे घर तयार होते. कुठून आवाज येतो हे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे समजले कि बाजूच्या फ्लॅट मधूनच आवाज येत आहे.
साधारण सायंकाळची ७ ची वेळ, एका घरातून मुलांचा मोठ-मोठ्याने रडण्या-ओरडण्याचा आवाज येत होता. कोठून आवाज येतो हे पाहण्यासाठी मी बाहेर गेले तर बाजूच्या घराचा दरवाजा थोडा उघडा होता, त्यातून काही हलकेसे दिसत होते, मी पाहिले की बाजूच्या आन्टी त्यांच्या मुलाला धबा-धब मारत होत्या व त्यांची लहान मुलगी ते पाहून खूप घाबरुन रडत होती. ती मध्येच बोलली आई नको तर तिच्या दोन थोबडीत लगवल्या. मी त्यांच्या घरात गेले व आन्टींचा हात पकडला व सांगितले काय झाल ऐवढ मारयला, जीव जायीस्तोवर मारणार अहात का? असे म्हटल्यावर त्या रागात म्हणाल्या ही माझी मुलं आहेत, मी काय करायच ते करेन यांच्यासोबत तू मध्ये बोलायच नाही, तुझा काही अधिकार नाही. नवीन आहेस इथे.. मी निघून गेले. नंतर मुलांकडून समजले कि परीक्षेचा निकाल आलेला व त्यात कमी गुण मिळाले होते आणि तरिही त्यांचे टि.व्ही पाहणे चालू होते. अन् त्यांची आई आधीच वैतागली होती ऑफिसच्या वर्कलोडमुळे आणि त्यात तिच्या मैत्रिणीच्या मुलाला चांगले गुण मिळालेले, त्यामुळे या सर्वांचा राग मारण्यतून काढला...
आपण आपल्या मुलांना वस्तू समजतो का? आपण त्यांना जन्म दिला म्हणून त्यांच्यावर मालकी हक्क गाजवायचा का? त्यांच्याकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून बघण्याची गरज आहे. शिस्तीच्या नावाखाली मुलांवर हात उगारणे हे योग्य नाही, याचा अर्थ असा होतो की पालकांमध्ये दोष आहे. लहान मुल म्हणजे एक मातीचा गोळा असतो त्याला आपण आकार देत असतो, एक रुप देत असतो, त्यात वैशिष्ट्ये आणतो, त्याला घडवतो. ते मूल मोठ्यांकडे बघतच शिकत असते, त्यामुळे त्याच्याकडे तुमचेच दुर्गुण व चांगले गुण दिसतात. हम भी कभी बच्चे थे! हा विचार पालकांनी करायला हवा. मुलांना विशेषणे लावण्यापूर्वी, मी अनेकदा पाहिले आहे मुल नीट अभ्यासात रस घेत नसेल त्याला गुण चांगले मिळत नसतील तर पालक स्वत:च मुलाला ठरवून मोकळे होतात. काय होत असेल त्या मुलाच जेंव्हा त्याचेच आई-बाबा त्याला समजून घेत नाहीत. चूक करणे पाप पण माणूस हा चुका करण्यासाठीच आहे. अनेक मोठ-मोठ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात चुका केलेल्या आहेत. अने जरा स्वत: कडे ही पहा तुम्हीही अनेक चुका केलेल्या आहेत. जेंव्हा तुम्हीत मुलाच्या टिचरला सांगता याने काही ऐकले नाही तर द्या लगाउन दोन-तीन. अरे काय काळीज आहे की नाही..? जेंव्हा शिक्षकांना म्हणता तुम्हीच बघा किंवा तुम्हीच लक्ष द्या, मग तुमची जबाबदारी काय? फक्त पैसे कमावून देणे. अहो, त्या भौतिक सुखांपेक्षा तुमच्या मुलाला, तुमच्या मायेची गरज आहे, तुमची साथ हवी आहे त्याला. एखाद पप्पी, एखाद मिठी त्याला तुमच्या खूप जवळ आणते हो. त्याचा हात पकडून शिकवणे.. चुकल तर समजावून सांगणे, आणि मुख्य दुस-याचा राग त्या मुलावर न काढणे.. नाहीतर तुमच मूल तुमच्यापासून किती दूर गेलेलं असेल ना ते तुम्हाला ही कळणार नाही, जेंव्हा समजेल तेंव्हा वेळ गेलेली असायची आणि तेंव्हा तुमची इच्छा असूनही तुमचं मूल परत येणार नाही. बघा विचार करा आपण कुठे आहोत, काय करतोय.. (८)

(पुढील ब्लॉग मध्ये आकडेवारी निशी या समस्येकडे पाहू...)

No comments:

Post a Comment